नवी दिल्ली: निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी रात्री ९.३० वाजता चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले. मात्र घरात करमत नसल्याने ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शेषन यांनी राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
Prime Minister Narendra Modi: Shri TN Seshan was an outstanding civil servant. He served India with utmost diligence and integrity. His efforts towards electoral reforms have made our democracy stronger and more participative. Pained by his demise. Om Shanti. https://t.co/3tkYHLtvSB pic.twitter.com/fGjB6eXkHi
— ANI (@ANI) November 10, 2019
Tamil Nadu: Former Chief Election Commissioner of India, T N Seshan passed away in Chennai, after a cardiac arrest. https://t.co/sfyRzjNFJT
— ANI (@ANI) November 10, 2019
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची १२ डिसेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून त्यांनी राजकारण्यांमध्ये निवडणूक आयोगाचा धाक निर्माण केला. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारण घडवून आणल्या.
रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणा-या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे. धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास बंदी त्यांनीच आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री १०नंतर बंद म्हणजे बंद! मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी. एन. शेषन यांनी केले.
