नवी दिल्ली: सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतले आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.

मात्र शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत आरपारची लढाई सुरु केल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून स्पष्ट होतं आहे. आता संसदेत देखील शिवसेनेचे राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदार विरोधी बाकांवर बसून भाजप सरकारला धारेवर धरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे एकाबाजूला राज्यात सत्ता केंद्र हातात घेऊन, राज्यातील भाजपाला महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये नामोहरण करून केंद्रात देखील अडचणीत आणण्याची योजना असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भारतीय जनता पक्षाचाच असेल असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, राज्यात क्रमांक एकचा पक्ष भारतीय जनता पक्षाच आहे. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ ११९ होते.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

आरपारची लढाई! शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसणार? सविस्तर वृत्त