नवी दिल्ली: सरकार स्थापनेचं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-एनसीपी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतची स्पष्टता अजून आहे.

सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच का सुटत नाही यावरच आम्ही चर्चा करतो आहोत, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो काही पेच निर्माण झाला त्याबाबत सोनिया गांधी यांना मी माझ्या परिने माहिती दिली.

बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले.

विशेष म्हणजे एकीकडे बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पवारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाली असल्याची माहिती देण्याता आली आहे. दरम्यान, पवारांनीच राऊतांना दिल्लीला बोलावलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोड़ींमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल चर्चा नाही; आघाडीच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेते आहोत