मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला परमनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे २९ वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन…’ असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला. यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.

हा सोहळा स्मरणीय करण्यासाठी शिवसेनेकडून तयारीत कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शपथविधीसाठी खास असे व्यासपीठ उभारले होते. एकूणच शिवाजी पार्कमधील आजचा सोहळा हा लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला असंच म्हणावं लागेल.

शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अभूतपूर्व शपथविधी सोहळा संपन्न