पुणे: महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-एनसीपी’सोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. परंतु, ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रोटोकॉलनुसार भेट झाली, यादरम्यान त्यांच्यात काहीसं बोलणंही झालं, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. पंतप्रधान येण्यापूर्वी तसंच पंतप्रधान गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि फडणवीस विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात एकत्र होते. तिथे त्यांच्यात काही वेळ बोलणं झालं, असं काकडे म्हणाले.

तसंच या सरकारला सध्या तरी काही धोका नाही, हे सरकार दीर्घकाळ चालेल. हे सरकार चालायला पाहिजे असं वाटतं. १९८० मध्ये शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं, अशी प्रतिक्रिया काकडेंनी दिली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का देत थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर भाजपचे नेते हे सरकार टिकणार नाही असं म्हणत असताना भाजपचे खासदार संजय काकडे यांनी मात्र त्याला छेद दिल्याचं पाहायला मिळत आहे.

१९८० मध्ये पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं: भाजप खा. संजय काकडे