नवी दिल्लीः बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.
मात्र आता मोदी सरकारची खरी कसोटी राज्यसभेत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, इसाई, शीख, बौद्ध आणि पारसी समाजाच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकातून मुस्लिम समाजाला बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यावरुनच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार आहे. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, यावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली असून केंद्र सरकारच्या हेतूवरच त्यांनी शंका घेतली आहे. देशातील नवरत्ने (सरकारी कंपन्या) विकण्याचा घाट घातला जातोय, जीएसटी ६ टक्क्यांनी वाढवण्याचा घाट आहे. महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाहीय. अशा वेळी लोकांना फसवण्यासाठी, भयानक अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती लोकांसमोर येऊ नये म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आणून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये. यातून काहीही साध्य होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आसाम मध्ये गोंधळ घातलाय तोच गोंधळ घालायचाय. यांना नव रत्ने विकायचीय त्यामुळे हे बिल आणलंय असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Vanchit Leader Prakash Ambedkar slams Modi Government over Citizenship Amendment Bill 2019 Approval in Parliament
