मुंबई: शिवसेना विरूद्ध अमृता फडणवीस वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती एक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
एलबीटी, टॅक्स खाती, कर्मचाऱ्यांचे पगार खाती सध्या एक्सिस बँक मध्ये आहेत. त्यांना सरकारी बँकमध्ये वळवण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेनेनं एकापाठोपाठ धक्कातंत्र हाती घेतले आहे. तत्पूर्वी ठाकरे सरकारने आणखी एक असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचा दणका आता ऍक्सिस बँकेला बसणार आहे. या बँकेत तब्बल २ लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे आली.
त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांची बँक खाती अन्य दुसऱ्या बँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या निर्णयानंतर आता मुंबई महापालिकेने हा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. आम्ही खासगी बँके ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत पालिका कर्मचाऱ्यांचे पगार सुरक्षित राहावे, यासाठी प्रयत्नशिल आहोत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आता दुसऱ्या बँकेत होणार, याला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या हजारो रुपयांच्या ठेवी तसेच अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची वेतन खातीही ऍक्सिस बँकेतून काढून राष्ट्रीयीकृत बँकेत नेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
