मुंबई: १९९३ मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो २१ दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai: A missing complaint has been filed by the family of Jalees Ansari, serial blasts convict, at Agripada police station on January 16. Ansari was out on parole. #Maharashtra
— ANI (@ANI) January 16, 2020
अजमेर येथे १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणाऱ्या जालीस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये त्याचा देशभरात झालेल्या इतर अनेक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जालीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जालीस याला अजमेर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातूनच त्याने पॅरोलच्या सुट्टीसाठी अर्ज केला. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली.
दरम्यान, मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना अशाप्रकारचा खतरनाक दहशतवादी बेपत्ता होणं, हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. सर्व तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. जलीस अन्सारीचे इंडियन मुजाहिद्दीन, सिमी यांच्यासह इतर दहशतवादी संघटनांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. तो अनेक दहशतवादी संघटनांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग द्यायचा. त्याला डॉ. बॉम्ब नावाने ओळखलं जातं. मालेगाव स्फोटातील तो प्रमुख आरोपी होता. देशभरातील जवळपास 50 बॉम्ब स्फोटात त्याचा हात असल्याचं सांगितलं जातं.
Web Title: Serial blast convict Terrorist Doctor Bomb is missing from Mumbai.
