मुंबई: शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतेच पद न मिळाल्याने जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ.तानाजी सावंत हे नाराज होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत खट्टू झाले होते. मंत्रिपद नाकारल्यापासून तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली नव्हती. त्यांनी शिवसेनेच्या अनेक बैठकांना दांडी तर मारलीच, शिवाय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीलाही गैरहजेरी लावली होती. त्यामुळे नाराजीनाट्यानंतरच्या पहिल्याच भेटीत उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी काय चर्चा केली, याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यात जयवंतराव प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी सावंत यांनी ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच जलसंधारण मंत्रिपदी असताना, तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटलं, या दाव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

तत्पूर्वी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला मदत केली होती. मात्र त्यानंतर शिवसेना त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी करत असल्याचं वृत्त पसरलं. शिवसेना पक्ष त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच पक्षविरोधी करवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता होती.

त्यालाच अनुसरून सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील निवास्थानी भेट घेतली होती. या भेटीमध्ये आमदार तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता होती. त्यांच्या भेटीत काय निर्णय होईल, याकडे कार्यकर्त्यांचे आणि प्रसार माध्यमांचे लक्ष लागलं होतं. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद झाल्यावर देखील तोच तोरा ठेवल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतापल्याचे वृत्त होतं.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तानाजी सावंत यांचा ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. त्यानंतर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खटकेही उडाले होते. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेनेच्या एका बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे सावंत यांच्याविरोधात पक्षामध्ये संतापाचे वातावरण होतं.

 

Web Title:  Former Minister Tanaji Sawant meet CM Uddhav Thackeray at Matoshri.

शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत अखेर मातोश्रीवर