डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असतो. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु होते. अग्निशमन दलाच्या तब्बल १२ गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होत्या. या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
सुरुवातीला आगीची तीव्रता कमी होती. मात्र, त्यानंतर एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले. स्फोटांच्या आवाजानं परिसरात घबराट पसरली होती. काही वेळानं आग अधिकच भडकली. त्यामुळं या कंपनीसह आसपासच्या कंपनीतील कर्मचारी सुरक्षित ठिकाणी गेले. या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही, असं सांगण्यात आलं.
यावेळी संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला होता. कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकल साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. मात्र कंपनीत नेमकी आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दुपारच्या प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी झाली नव्हती, पूर्णपणे माहिती घेणे, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती केडीएमसीचे अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.
या घटनेनंतर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी आमदार राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, ‘सरकार डोंबिवलीत एखादं भोपाळ होण्याची वाट पाहतायं का? असा प्रश्नही राजू पाटील यांनी सरकारला विचारला आहे’.
“काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डोंबिवली दौऱ्यासाठी आले होते. काही नागरिकांनी समस्या सांगितली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. काही वर्षांपूर्वी हायकोर्टाने ज्या 5 कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ही एक कंपनी आहे. तीही बंद करण्यात आली नाही. सरकार डोंबिवलीत एखादं भोपाळ होण्याची वाट पाहतायं का?” असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.
तसेच “मी मुख्यमंत्र्यांवर असा काही आरोप करत नाही. मात्र ते संशयाच्या भोवऱ्यात सापडण्यापूर्वी त्यांनी लवकरात लवकर कारवाई करा, अशी मी नागरिकांतर्फे विनंती करतो, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल,” असा टोलाही राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
Web Title: Story MNS MLA Raju Patil criticizes CM Uddhav Thackeray government over Dombivli MIDC Fire.
