मुंबई, ११ मे: मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

पंतप्रधानांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

तसेच लॉकडाऊनबाबत बोलताना त्यांनी जून, जुलैमध्ये कोरोनाचा उच्चांक होऊ शकतो. वुहानमध्ये परत कोरोनाने डोके वर काढलेय अशा बातम्या वाचल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. यामुळे लॉकडाऊनबाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्रात करोनापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसाना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल.

 

News English Summary: Suburban railway service should be started in Mumbai. However, Chief Minister Uddhav Thackeray has also demanded that Prime Minister Narendra Modi should be allowed to travel only after seeing his identity card.

News English Title: Corona virus lockdown Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray local train service PM Narendra Modi News Latest Updates.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी – मुख्यमंत्री