नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याने आम्ही ते स्वीकारणार नाही असा आक्रमक पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे.

आज नवी दिल्लीत ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे. परंतु या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वितरणावरून आणि पुरस्कार विजेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारपुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहू शकणार नाहीत, कारण आहे त्याचं राष्ट्रपतींच व्यस्त वेळापत्रक. त्याच कारणाने राष्ट्रपती एकूण पुरस्कार विजेत्यांपैकी अकराच मानकऱ्यांना सन्मानित करतील आणि इतर वेळापत्रकाप्रमाणे ठरलेल्या कार्यक्रमाला मार्गक्रमण करतील.

राष्ट्रपतींच्या या व्यस्त वेळापत्रकामुळे पुढील पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सुपूर्द केले जाणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार वितरण हे प्रथम तांत्रिक पुरस्कार आणि नंतर मुख्य पुरस्कार असा होतो. परंतु नेमके कोणते अकरा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सुपूर्द केले जाणार आहेत ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

परंतु हे राष्ट्रीय पुरस्कार जर आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित केले जाणार नसतील तर आम्ही या आयोजित सोहळ्यावरच बहिष्कार टाकू असा आक्रमक पवित्र पुरस्कार विजेत्यांनी घेतल्याने सरकार समोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. म्होरक्या’चे दिग्दर्शक अमर देवकर यांनी स्पष्ट केलं की, “स्मृती इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास आमचा विरोध नसून, हे राष्ट्रीय पुरस्कार असून ते राष्ट्रपतींकडून न दिले जाण्याला आमचा विरोध आहे. इतर पुरस्कार सोहळ्यात आम्ही स्मृती इराणींच्या हस्ते सन्मान स्वीकारलाच असता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

national film awards today but few winners threatened to boycott the ceremony