मुंबई : अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळतच मुंबई शहरातील रिक्षावाल्यांनी नेहमीप्रमाणे संधी साधली आहे. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांनी कसे ही करून ऑफिस गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र होते. प्रति प्रवाशामागे ऑटो रिक्षाने अंधेरी ते वांद्रा हे अंतर केवळ १५० रुपयात सहज गाठता येत, पण प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली.
दुसरा पर्याय नसल्याने ऑफिसला लवकर पोहचण्याच्या आशेने प्रवाशांनी सुद्धा वाट्टेल ती किंमत मोजली आहे. ज्या शहरांवर आणि प्रवाशांवर रिक्षावाल्यांच घर चालत तोच मुंबईकर जेव्हा घराबाहेर पडून प्रवासाला निघतो तेव्हा प्रवासादरम्यान एखाद संकट याच प्रवाशांवर येतात तेव्हा हेच रिक्षाचालक त्याला संधी समजून अधिक पैसे उकळतात हा दरवेळचा अनिभव आहे.
त्यामुळे शहरात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रामाणिक रिक्षाचालक उरले असावेत. परंतु शहरावर आलेल्या संकटाला संधीत रूपांतरित करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या प्रचंड मोठी आहे.
