कोल्हापूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ही टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडविणे गरजेचे आहे. सध्या राज्यात निर्माण झालेली अस्वस्थता ही महाराष्ट्राच्या हिताची नाही, असं शरद पवार म्हणाले. योग्यती घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः विरोधकांना एकत्र येण्याची विनंती करायला तयार आहे, असंही पवार स्पष्ट सांगितलं. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी विधाने ही केवळ आगीत तेल ओतणारी आहेत. राज्य सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे, असं खुलं आव्हानही शरद पवार यांनी महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केलं.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आणि मराठा आरक्षणावर तोडगा तसेच चर्चा हाच मुख्य अजेंडा असणार आहे. परंतु तत्पूर्वी शरद पवारांनी मराठा समाजाच्या हिंसक आंदोलनाला थेट मुख्यमंत्री आणि सरकारला जवाबदार धरल्याने या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
