मुंबई : आगामी निवडणुकीआधी ईव्हीएम मशीन्स वरून राजकारण तापताना दिसत आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या गंभीर विषयावर आक्रमक झालेले दिसत असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणेज ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांना पत्र पाठवून ईव्हीएम’ला तीव्र विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी ईव्हीएमविरोधात जाहीर विरोध केला आहे आणि त्यासाठी इतर पक्षातील प्रमुखांना पत्र पाठवून त्यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेवून ईव्हीएमला विरोध करण्याचं आवाहन तर केलंच शिवाय त्यांनी याविषयी पवारांशी बराचवेळ चर्चा सुद्धा केली आहे. त्यालाच अनुसरून पवारांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागू, असं आश्वासन राज ठाकरे यांना दिल आहे.
दरम्यान येत्या रविवारी होणाऱ्या ईव्हीएम विरोधातील रॅलीला पाठींबा देण्याची विनंती त्यांनी या नेत्यांना केली आहे. या विषयाला अनुसरूनच सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी सुद्धा दिल्लीतील या बैठकीला हजर होते. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची भूमिका निवडणूक आयोगाला कळवली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील इतर सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया तसेच व्हीव्हीपॅट मतदानयंत्रांबाबतच्या सूचना कळवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे नक्की कोणत्या वेगवान हालचाली होतात ते पाहावं लागणार आहे.
