नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे आणि त्यात भाजपने विश्वविक्रम केला आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६०,००० कोटीं खर्च करण्यात आले आहेत. मात्र यापैकी तब्बल ४५ टक्के म्हणजेच २७,००० कोटींची रक्कम ही एकट्या भारतीय जनता पक्षाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान २०१४ आणि २०१९ मधील एकूण खर्चाची तुलना केल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी ही धक्कादायक शक्यता वर्तविली आहे. सर्व भ्रष्टाचाराची जननी ही या निवडणुकीच्या खर्चामध्ये आहे. जर आपण हे मूळ शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार संपवू शकणार नाही अशी भीत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. खर्चाच्या या वाढत्या प्रमाणाने आम्हाला घाबरवावे आणि एक मजबूत लोकशाही तयार करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलण्याविषयी उद्युक्त करावे, असे ते म्हणाले.

१९९८ मध्ये भारतीय जनता पक्षाने २० टक्के पैसा खर्च केला होता. तर काँग्रेसने २००९ मध्ये एकूण खर्चाच्या ४० टक्के पैसा खर्च केला होता. हा खर्च आता १५ ते २० टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषन करण्यात आले आहे. यानुसार एका मतदारासाठी ७०० रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच १२ ते १५ हजार कोटी रुपये थेट मतदात्यांना वाटण्यात आले, तर २० ते २५ हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी ५,००० कोटी, औपचारिक खर्च १० ते १२ कोटी आणि अन्य खर्चासाठी ३ ते ६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्य़ात येत असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.

मोदी है तो मुमकिन है! लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून २७ हजार कोटी खर्च: CMS अहवाल