नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात असे सांगून काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे असंही म्हटलं आहे.

जुन्याच योजना, मोठ्या घोषणा आणि आकडे यांनी भरलेला हा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे, सर्वसामान्यांना यातून काहीच मिळणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “अनेक सरकारी कंपन्या विकायला काढलेल्या असताना, सरकारी तिजोरी खाली असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू यासारख्या धूळ’फेकू’ योजनांचा पाढा निर्मला सीतारामन यांनी वाचला. घसरणारी आकडेवारी वेगळं सूचित करत असताना, केलेल्या घोषणांवर विश्वास ठेवायचा कसा? अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे”.

यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत भाजप सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. “खरंच तो आकडा नक्की काय आहे? ते आधी बघावं लागेल. मी सकाळपासून कामात आहे. त्यामुळे तुम्ही जो आकडा सांगत आहात, तो बघावं लागेल. मी अजूनही पूर्ण बजेट बघितलेलं नाही. १५ लाख कोटी हा आकडा खरचं खोलात जाऊन बघावा लागेल,” असे रोहित पवार म्हणाले.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray is not happy with the Union Budget 2020.

Budget2020 : केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे