नवी दिल्ली: भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
परंतु, आता ही घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इस्रो (ISRO) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय लष्कराला मदत करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवणं भारतीय लष्कराला शक्य होणार आहे.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर आजूबाजूच्या देशांच्या सीमांवर थेट अवकाशातून नजर ठेवण्यासाठी इस्रो एक खास उपग्रह लॉन्च करणार आहे. यामुळे गृह मंत्रालयाला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती काल सरकारकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना एका समितीनं केंद्राकडे केली होती. दरम्यान सदर सूचना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली.
