गांधीनगर : मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
सॅम पित्रोदा यांनी गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. आपण जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा करतो तेव्हा त्याला लगेचच राजकीय रुप दिलं जातं अशी खंत सुद्धा त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली आहे. देशाचे भविष्य हे विज्ञानावर आधारित असत आणि फक्त विज्ञानामुळेच देशाचं भविष्य घडू शकत, परंतु दुर्दैवाने सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा होत असल्याची खंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केली.
देशातील तरुणांकडून जेव्हा रोजगारासंबंधी चर्चा होते तेव्हा विशेषकरून राजकारण्यांकडून भरकटवलं जात. निरुपयोगी गोष्टी सांगून तरुणांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे असं सनसनाटी आरोप सुद्धा त्यांनी केला. नेते मंडळी अशा विषयांवर बोलत असतात ज्यांना काहीच अर्थ नसतो, कारण संपूर्ण आयुष्यात त्यांनी भाषण देण्याव्यतिरिक्त समाजासाठी दुसरं त्यांनी काहीच केलेलं नसतं. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची योग्यता नाही असं सॅम पित्रोदा बोलले आहेत. त्यानाच एकूणच रोख हा देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर होता असं जाणवत होत.
