रसडा: उत्तर प्रदेशात रसडा जिल्ह्यातील अठीला गावात पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपावरून स्थानिक पोलिसांनी दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. रसडा गावाचे प्रभारी कोतवाल ज्ञानेश्वर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नियुक्त केलेले नोडल अधिकारी सेंथिल पांडियन सी यांच्याकडे अठीला गावातील स्थानिक लोकांनी लेखी तक्रार करून पंतप्रधान घरकुल योजनेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर संबंधित नोडल अधिकारी सेंथिल पांडियन सी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रसडा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विपीन कुमार जैन यांना सदर प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर उपजिल्हाधिकारी विपीन कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चौकशी दरम्यान एकाच गावातील तब्बल १४ अपात्र लोकांना पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरवून त्यांना घरं देखील देण्यात आली होती. तसेच जवळपास १६ लोकांनी पैसे भरून देखील घरांची कामं सुरु झालेली नाहीत, तरी देखील ग्रामपंचायत सचिवांनी घर पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, उपजिल्हाधिकारी विपीन कुमार जैन यांच्या नैतृत्वाखाली झालेल्या चौकशीच्या आधारे प्रभाग विकास अधिकारी अशोक कुमार यांनी सदर विषयाला अनुसरून रसडा जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि अन्य २३ संशयितांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ग्रामविकास अधिकारी हर्षदेव आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय शंकर यांना अटक करून तुरंगात धाडण्यात आले आहे. त्यामुळे प्रकार देशभर अनेक गावात घडले असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा; न्यायालयात याचिका दाखल, २ सरकारी कर्मचाऱ्यांना अटक