नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाण्यावरुन तिढा वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ५९ वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार झाला. दरम्यान, सदर कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. त्यामुळे लवकरच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सुद्धा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही.
सध्या पाकिस्तानात सुद्धा पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीजवळच्या भागात स्थानिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. तसेच भारतातील सीमारेषेवर काही वेगळी परिस्थिती नाही. धक्कादायक म्हणजे भारतातील तब्बल तीन-चतुर्थांश लोकांच्या घरांमध्ये पिण्यासाठी आवश्यक असलेले स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यात उपलब्ध पाण्यापैकी ७० टक्के पाणी हे प्रदूषित झालं आहे, अशी आकडेवारी भारत सरकारच्या अहवालात समोर आली आहे.
तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करार अस्तित्वात आला होता. त्यावेळी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार प्रत्यक्षात अंमलात आला होता. दरम्यान, याच कराराचं आता दोन्ही देशांकडूनच उल्लंघन होत असल्याचा दोन्ही देश परस्परांवर करत आहेत. त्यात सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचं काम जोरात सुरू आहे. नेमका त्या कामावरच आता पाकिस्ताननं आक्षेप घेत आहे. त्यामुळे भारताकडून सिंधू जल कराराच उल्लंघन सुरू असल्याचा कांगावा करत पाकिस्ताननं थेट पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे.
