नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

दरम्यान, या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. यानंतर जय भगवान गोयल यांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या संवादामध्ये यावर पूणर स्पष्टीकरण दिलं, मात्र त्यामुळे अजूनच संतापाची लाट उसळू शकते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी म्हटलं की, “प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानुसार मला जे वाटलं ते मी लिहिलं. मी पुस्तक लिहून माझ्या भावना प्रकट केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजांनीही ते पुस्तक वाचावं. मी त्यात काहीही वादग्रस्त लिहिलेले नाही. मीही शिवाजी महाराजांचा सन्मान करतो,” असेही गोयल म्हणाले.

तसेच “मी जितका छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो, तेवढा सन्मान मराठी लोकही करत नसतील,” असे स्पष्टीकरण ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भारतीय जनता पक्षाचे नेते जय भगवान गोयल यांनी दिले. “जे लोक पुस्तकावर चर्चा करत आहे. त्यांनी एकदा पुस्तक वाचा. त्यांना उत्तर मिळेल. ज्यांना माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल करायचे आहे. त्यांना सर्व अधिकार आहे,” असेही गोयल यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. तसेच साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण त्या पुस्तकात नेमकं काय छापलं आहे ते तपासून प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमधील अति उत्साही पदाधिकाऱ्यांना आवरा असं म्हटलं आहे.

मराठी लोकं करत नसतील तेवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान मी करतो: गोयल