नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देणार आणि तो स्वीकारला जाणार का हे अजून निश्चित झालेले नसताना आता काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी जर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिले तर काँग्रेसमध्ये या हालचालींना जोर येईल असं वृत्त आहे. तसेच त्यांनी निर्णय बदलला नाही तर अशावेळी पक्षाकडून दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. गांधी कुटुंबीयाकडे अध्यक्षपद नको या परिस्थितीत पक्षाकडून हंगामी अध्यक्ष बनविण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे.

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीचा विचार केला तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो. या हंगामी अध्यक्षाला निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी एक विशिष्ट समिती असेल ज्यात काँग्रेसच्या मोठ्या चेहऱ्याचा समावेश करण्याचे एकत्रितपणे ठरविले जाईल. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते ए. के एंटनी आज राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात केवळ ५२ जागांवर विजय मिळविता आला आहे. लोकसभेच्या स्थितीवर देखील भेटीत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षाच्या स्तरावर आत्तापर्यंत कोणताही मोठा निर्णय घेतला गेला नाही.

राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेसमधील दिग्गज मंडळी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. जर राहुल गांधी अध्यक्षपदावर कायम राहण्यास तयार झाले तर पक्षात मोठे बदल होणार नाहीत. लोकसभेत काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे यासाठीही पक्षाचे नेते आग्रह धरत आहेत. पुढील आठवड्यात लोकसभेतील काँग्रेस नेत्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. संसदेचे अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरु होणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीच्या हालचाली?