हैदराबाद – हैदराबादमध्ये बुधवारी प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार (Dr. Priyanka Reddy Rape case) करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रियांकाच्या हत्येनंतर #RIPPriyankaReddy #drpriyankareddy #JusticeForPriyanka हा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला असून देशभरातील असंख्य ट्विटर वापरणाऱ्यांनी या घटनेबद्दल खेद आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी आरोपीला डॉक्टर तरुणीला जाळून मारले त्याप्रमाणे सर्व लोकांसमोर आरोपींना जाळून मारा अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बलात्कार हा गंभीर गुन्हा आहे आणि तो कोणत्याही स्त्री किंवा मुलीच्या बाबतीत घडला तरी ती बाब गंभीरच आहे. मात्र काहींनी त्यात देखील धर्म शोधला असून मूळ मुद्दा सोडून या प्रकाराला धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री पायल रोहतगी हिने देखील एक ट्विट केले असून त्यात तिने म्हटले आहे की, ‘मुस्लिम बहुल भागात हिंदू तरुणीला’ बलात्कार करून जाळून मारण्यात आले. देशातील माध्यमांनी ही बातमी प्रकर्षाने दाखवावी आणि प्रियांकाला न्याय मिळवून द्यावा. तसेच देशभरातून अनेक प्रतिक्रिया या अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेनंतर उमटू लागल्या आहेत.

केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून हैदराबादमध्ये महिलेला जिवंत जाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. के. किशन रेड्डी यांनी सांगितले, की आम्ही तेलंगण सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. जे कुणी या महिलेला जिवंत जाळण्यात सामील असतील त्यांची गय केली जाणार नाही. आता यापुढे सर्वच राज्यांनी महिलांविरोधात असे गंभीर गुन्हे होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. तेलंगणचे पोलिस महासंचालक दिल्लीत येत असून त्यांना आपण भेटणार आहोत. जे लोक या गुन्ह्य़ात सामील असतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालावा, त्यांचे वकीलपत्र कुणी घेऊ नये.

महाराष्ट्रातील बहुचर्चित कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला होता. बलात्कार करणाऱ्यांना कडक शासन करण्यासाठी शरियासारखा कायदा हवा आणि बलात्काऱ्यांचे हात-पाय तोडले पाहिजेत, असे राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले होते. मात्र आज राज ठाकरे यांच्या त्याच मताची आठवण समाज माध्यमांवर करून दिली जातं आहे.

डॉ. प्रियांका रेड्डीवर सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळले; राज यांच्या त्याच मागणीची चर्चा