नवी दिल्ली : भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात याच बायोमेड कंपनीची लस वापरल्याचे समोर आल्याने या दोन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे पोलिओमुक्त भारतावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पालक धास्तावले असून आपल्या मुलांना याच कंपनीची लस दिली गेली नाही ना अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बायोमेड कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्या आहेत असं स्पष्ट झालं आहे. राज्यातील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ व्हायरसचे लक्षण आढळून आल्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदवून कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे.
