नवी दिल्ली: गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच जम्मू काश्मीरमधील पुलवामातला सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्लादेखील भारतीय जनता पक्षाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दुसरा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भारतीय जनता पक्षाच मोठं षडयंत्र होतं. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राइक भाजपानं अगदी नियोजितपणे केलेला हल्ला होता, असा दावा वाघेला यांनी केला. दरम्यान ‘बालाकोटवर हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात कोणीही मारलं गेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये २०० जण मारले गेले नाहीत, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेनं अधिकृतपणे सांगितलेलं नाही,’ याची आठवण वाघेला यांनी करून दिली. पुलवामा हल्ल्याची माहिती असूनही तो हल्ला होऊ दिला गेला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ‘भारतीय गुप्तचर विभागानं पुलवामात हल्ला होणार असल्याची पूर्व कल्पना गृहमंत्रालयाला दिली होती. परंतु तरी देखील सदर हल्ला रोखण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलण्यात आली नाहीत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकबद्दल वाघेला यांनी काही थेट सवाल उपस्थित केले. ‘बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची माहिती सरकारकडे आधीपासूनच होती. मग तिथे आधीच कारवाई का करण्यात आली नाही? पुलवामात हल्ला होण्याची वाट का पाहिली गेली?,’ असे प्रश्न त्यांनी विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही वाघेलांनी भाष्य केलं. ‘भाजपाचं गुजरात मॉडेल खोटं आहे. गुजरातमध्ये अनेक अडचणी आहेत. राज्य संकटातून जात आहे. राज्यातले भाजपा नेते नाराज आहेत,’ असा दावा वाघेलांनी केला.
