१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे भारतीय राखीव दलावर झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाने पाकिस्तान स्थित पाक व्याप्त काश्मीर मध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद च्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला. हा हल्ला प्रचंड मोठा असून १२ मिराज-२००० विमानांनी एकत्रित १००० किलोचा बॉम्ब टाकून एअर स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे.
या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २०० – ३०० दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच कच्छ बॉर्डर जवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन विमान देखील उध्वस्थ केल्याचे वृत्त आहे.
परंतु पाकिस्तान हवाई दलाने काही वेगळीच कथा रंगवत पाकची फायटर विमानं येताच भारतीय विमानांनी पळ काढल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते पाकिस्तानी विमानं येताच भारतीय वायुदलाने रिकाम्या जागी बॉम्ब पाडून पळ काढला.
दरम्यान, तब्बल २१ मिनिटे वायू दलाचे विमान पाकमध्ये होते. एका विमानात ४८ बॉम्ब होते असे प्राथमिक वृत्त आहे. पण याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे माध्यमातून वृत्त येत आहे.
