नवी दिल्ली : काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणू शकतात. आज या महाभियोगासंबंधी निर्णय घेण्यासाठी संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे त्यावेळी ते स्पष्ट होणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती आणि ती म्हणजे १२ जानेवारीला २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ४ वरिष्ठ न्यायाधीशांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रस्तावाची चर्चा देशभरात सुरु झाली होती. सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
याआधी सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून विरोधी पक्षातील खासदारांनी फेब्रुवारी महिन्यात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. तेव्हा पासूनच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीसांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या चर्चांना देशभरात उधाण आलं होत.
परंतु सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या. ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आणि ही याचिका राजकीय हेतूने आणि चर्चेत राहण्यासाठी दाखल झाल्या आहेत. तसेच या याचिकांचा ठोस आधार नाही. केवळ न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे. सीबीआय न्यायमूर्ती. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक म्हणजेच ह्रदयविकाराच्या झटक्यानेच झाला, असे कोर्टाने निकालाद्वारे स्पष्ट केले.
