नवी दिल्ली : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.

‘चांद्रयान-२ पूर्णतः भारतीय रंगात न्हाऊन निघालेली मोहीम आहे. ते एक संपूर्णपणे स्वदेशी मिशन आहे. चांद्रयान २ मुळे भारतीय वैज्ञानिक श्रेष्ठ असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे’, अशा शब्दात मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांना कौतुकाची थाप दिली.

एकीकडे इस्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चांद्रयान 2’ च्या उड्डाणाची तयारी करत होते. या मोहिमेतून देशाचे नाव जगाच्या नकाशावर आणि अंतराळावर कोरण्याचा प्रयत्न इस्रोचे वैज्ञानिक अन् इंजिनिअर्स करत होते. परंतु, दुसरीकडे केंद्र सरकारने इस्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारात कपात केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने १२ जून २०१९ रोजी एक आदेश जारी केले होते. त्यानुसार १९९६ पासून मिळणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले होते.

देशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेल किंवा चांद्रयान २ च्या लाँचिंगच असेल. इस्रोचे शास्त्रज्ञा दिवस-रात्र एक करुन देशाचे नाव जगात रोशन करत होते. देशाची अंतराळ ताकद वाढवत आहेत. परंतु, याच इस्रोमधील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण, सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येणार आहे. १ जुलै २०१९ पासून हा भत्ता बंद करण्यात आला आहे. या आदेशानंतर डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना हा भत्ता मिळणार नाही. इस्रोमध्ये तब्बल १६ हजार शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आहेत. त्यामुळे या आदेशानंतर जवळपास ८५ ते ९० टक्के शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संच्या पगारात दरमहा ८ ते १० हजारांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या या आदेशामुळे इस्रो नाराज असल्याचे बोलले जाते.

चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले