नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

ते म्हणाले, भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता न आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल, हे सांगण्यासही स्वामी विसरले नाहीत. ‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे.

भारतीय जनता पक्षाला २३० किंवा त्याहून कमी जागा मिळाल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. समजा भाजपानं २२० किंवा २३० जागा जिंकल्या, आणि एनडीएच्या मित्र पक्षांना ३० जागा मिळाल्या, तर तो आकडा २५० पर्यंत जाईल. मात्र तरी देखील बहुमतासाठी ३० जागांची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान राहणार की नाही, हे एनडीएतील इतर मित्र पक्ष ठरवणार आहेत. आम्हाला ३० किंवा ४० जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षानं जर मोदींना पंतप्रधान करण्यास विरोध केला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान करणार नाही, असंही स्वामी म्हणाले आहेत.

मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. कारण गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे. तसेच गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत. मायावती एनडीएत येतील का, या प्रश्नालाही स्वामींनी उत्तर दिलं. मायावतींनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष भाजपाच्या विरोधात लढतोय. अशातच मायावती कशा सोबत येतील. मायावतींनी ठरवल्यास बसपा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. माझा यावर काहीच आक्षेप नाही.

भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी