रायबरेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००४ मधील इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयी देखील अजिंक्य होते परंतु त्यावेळी देखील आम्हीच जिंकलो होतो. दरम्यान, २००४ मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी आणि राजकीय विश्लेषक दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील, परंतु त्यांचा दावा फोल ठरला आणि जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यूपीतील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान देण्यात आलं. भारताच्या इतिहासात असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, ते अजिंक्य आहेत त्यांना कोणीही हरवू शकत नाही मात्र या देशातील जनता त्यांच्यापेक्षा मोठी आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षात देशातील जनतेसाठी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त अनिल अंबानी यांना राफेल कंत्राट कसं मिळालं? याचं उत्तर द्यावं असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.

मोदींनी २००४ मधील इतिहास विसरु नये सोनिया गांधी