नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाकडून कडक शब्दांत शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे आणि त्याचे पडसाद थेट दिल्लीतून उमटले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेवरुन भारतीय जनता पक्षावर करण्यात आलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव (BJP National Spoke person GVL Narasimha Rao) यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला लगावला आहे.

यावेळी बोलताना जीवीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले की, आम्ही आहे त्याठिकाणीच उभे आहोत, बाहेर गेल्यानंतर तुम्ही कसं बोलू शकता की, तुम्ही घराचा हिस्सा आहात. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले, दोन दिवसांपूर्वी काही वेगळं बोलतात, आज काही वेगळं बोलतात अशा शब्दात शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे.

हिंदू राजे पृथ्वीराज चौहान (HIndu King Prithviraj Chauhan) आणि मोहम्मद घोरी (Muhammad Ghori) यांच्यात १८ छोटी-मोठी युद्धं झाली. त्यातल्या १७ युद्धांमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येकवेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. हीच चूक त्यांना महागात पडली. शिवसेनेनंही महाराष्ट्रात घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले. हीच प्रवृत्ती आज शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.

शेवटच्या युद्धात मोठी तयारी करुन आलेल्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यांनी वेळोवेळी दिलेली जीवदानं विसरुन घोरीने कृतघ्नपणा केला. पृथ्वीराज चौहान यांना अटक केली. त्यांचे हालहाल केले. महाराष्ट्रातही आम्ही अशा विश्वासघातकी आणि कृतघ्न प्रवृत्तीला अनेकदा जीवदान दिले. आज हीच प्रवृत्ती शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करते आहे. शिवरायांच्या महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या (Saamana Newspaper) अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले आहेत: जीवीएल नरसिम्हा राव