औरंगाबाद: हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यापासून इम्तियाज जलील हे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जलील यांचा विजय झाला आणि ते औरंगाबादचे खासदार झाले. त्यामुळे यंदा ते मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे सर्वांना अपेक्षित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धार्थ उद्यानात शहिदांना अभिवादन करून हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण केले. जलील हे औरंगाबादचे खासदार झाल्यानंतर ते या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी अपेक्षा औरंगाबादमध्ये व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्री आपली महाजनादेश यात्रा सोडून हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाला आले असताना, नव्याने खासदार झालेले इम्तियाज जलील मात्र आले नाहीत, हा औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय बनला. याबाबत अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ, आ. कृ . वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी लढा दिला होता. या संघर्षात अनेक जण हुतात्मा झाले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करून घेतले. तेव्हा पासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्याला पुढे शासकीय स्वरूप देण्यात आले. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील सिद्धार्थ उद्यानात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त करण्यात येते.

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनास खासदार इम्तियाज जलील यांची दांडी