नवी दिल्ली : वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ ५०० रुपये होता. नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट १० हजार रुपये करण्यात आला आहे. केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते.

काही नियमभंग आणि नवी दंड आकारणी

  1. हेल्मेन न घातल्यास – आतापर्यंत १०० रुपये दंड होता, आता १,००० रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द
  2. विना परवाना वाहन चालवल्यास – आधी ५०० रु., आता ५ हजार रुपये दंड.
  3. दुचाकी अतिरिक्त भार – आधी १०० रु., आता २ हजार रुपये दंड.
  4. सीट बेल्ट न लावल्यास – आधी १०० रुपये, आता १००० रुपये दंड.
  5. वाहन चालवताना फोनवर बोलल्यास – आधी एक हजार रु., आता ५ हजार रु. दंड

सावधान! आजपासून गाडी चालवताना चूक केल्यास दंड भरताना सगळा पगारच जाईल