गांधीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे मोठ्या घोषणा करण्यात गुजरातचे नेते सर्वाधिक आघाडीवर आहेत. २०१४ पूर्वी गुजरात मॉडेलच्या विषयी देखील बरीच चर्चा पाहायला मिळाली, मात्र गुजरातच्या ग्रामीण भागातील भीषण वास्तव समोर येत आहे. गुजरातमधील सोनगड जिल्ह्यातील गावाप्रमाणे इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असून स्थानिकांना हंडाभर पाण्यासाठी ४-५ किलोमीटर इतकी रोजची पायपीट करावी लागत आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात धरण असून देखील याभागात भीषण दुष्काळ पसरला आहे आणि रोजच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी गावकरी कित्येक मैल रोजचा प्रवास करत असल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातील अनेक गावं उकाई बंधाऱ्यापासून केवळ ३० किलोमीटरच्या क्षेत्रात वास्तव्यास असून देखील, गावातील ७०० फूट खोल असलेल्या बोरवेलवर तासंतास अवलंबून राहावं लागत आहे.

यातील मल गावातील लोकांनी मागील विधानसभा निवडणुकीवर याच कारणाने जाहीर बहिष्कार टाकला होता. त्यात पाण्याचे टँकर पोहोचण्यासाठी गावात रस्ते देखील बिकट स्थितीत असल्याने सर्वच भयाण असल्याचं एएनआय या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. स्थानिक लोकांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रस्त्यांची परिस्थिती न बदलल्यास निवडणुकीवर पुन्हा बहिष्कार टाकण्यात येईल असं म्हटलं आहे. मात्र गावात केवळ ४३४ लोकसंख्या असल्याने त्यांना गृहीत धरण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सरकारी हॅन्डपंप’वर पाणी भरण्यासाठी स्थानिकांना सकाळी ४ वाजल्यापासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागते असं स्थानिकांनी म्हटलं आहे आणि त्यात उष्णता प्रचंड वाढल्याने कधी कधी पाणीच उपलब्ध होत नसल्याचं सांगत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ग्रामीण गुजरातमध्ये भीषण दुष्काळ हंडाभर पाण्यासाठी ४-५ किलोमीटर पायपीट