नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधील कठुआतील ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता आंतरराष्ट्रीय मंचावरून सुद्धा मोदी सरकारचे कान टोचले जात आहेत.
खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले आहेत. भारतात कठुआ प्रकरणाने माझं मन खरंच बीभत्स होतं. पण मला आशा आहे की, भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देतील.
कठुआ आणि उन्नावमधील बलात्कार प्रकरणानंतर देशभरात असंतोष व्यक्त होत असताना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे. पुढे क्रिस्तिना लगार्ड म्हणाल्या की, मी डाव्होसमध्ये मोदींना भेटले होते. तिथे देखील मोदींच्या भाषणात भारतीय महिलांचा फारसा उल्लेख नव्हता. यावरुन मी त्यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली होती, असे त्यांनी नमूद केले. एक महिला म्हणून माझं हे वैयक्तिक मत आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत समजू नये असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.
