मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या हस्ते दादरमधील आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी राज यांनी पश्चिम बंगालच्या घटनेवरून भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. यावेळी राज म्हणाले, नरेंद्र मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेले बरे. कारण तेच नरेंद्र मोदी काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायच असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, ५ वर्षात नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर कधीच आले नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना इतके का घाबरतात, याचे उत्तर त्यांनी स्वत:च द्यावे. असे त्यांनी नेमकं काय केले, ज्यामुळे ते पत्रकारांपासून लांब पळत आहेत, असा प्रतिप्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या या सर्व टिकेला भारतीय जनता पक्ष नेमकं काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे