नवी दिल्ली: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षानं (Bharatiya Janata Party) देखील शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा.

स्थायित्व आणि विविधता ही राज्यसभेची (Rajyasabha) दोन वैशिष्ट्ये आहेत. लोकसभा विसर्जित होते, पण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तसेच ती होणारही नाही. येथे राज्यांचे प्रतिनिधित्व निश्चित होते. त्यामुळे येथे विविधता दिसून येते. तसेच निवडणूक प्रक्रियेतून सभागृहात येऊ न शकणाऱ्या गुणवान व्यक्तींना या सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यांचे गुण, अनुभव यांचा देशाला फायदा होतो.

६ वर्ष भ्रष्टवादी संबोधलं; मोदींसाठी राष्ट्रवादी अचानक सद्गुणी; पवारांनी चाणक्यचा अर्थ शिकवला?