मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमताने मिळालेल्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधापदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील त्यांचा शाही शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. पण मोदी हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत व घटनेच्या चौकटीत राहूनच पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. शपथविधी सोहळय़ासाठी ममता बॅनर्जी यांना दिलेले निमंत्रण त्यांनी नाकारले. हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही.
पश्चिम बंगालात निवडणूक काळात हिंसाचार झाला हे सत्य आहे. हिंसाचारात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास बोलावले हे काही रुसण्याचे कारण होऊ शकत नाही. ही सर्व कुटुंबे बांगलादेशी नसून हिंदुस्थानी नागरिक आहेत व इतर सगळय़ांप्रमाणेच पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास हजर राहण्याचा अधिकार त्यांना आहे. ममता व त्यांच्या पक्षाला हे मान्य नसेल तर त्या लोकशाही मानत नाहीत हे नक्की अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
