नवी दिल्ली : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
असं असलं तरी शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार असलेलं हे अवजड उद्योग खातं जणू शिवसेनेचं पारंपरिक खातं भाजपने राखून ठेवलं आहे. अगदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन शिवसेनेचे हेवीवेट नेते मनोहर जोशी यांना केंद्रात पाठविण्यात आले तेव्हा देखील हेच खातं त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या या खात्यामुळे राज्यात किती अवजड उद्योग आले हा संशोधनाचा विषय असला तरी मनोहर पंतांचे सर्व खाजगी मात्र याच कार्यकाळात अवजड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मागील ५ वर्ष देखील शिवसेनेचे अनंत गीते यांना हेच खातं देण्यात आलं आणि त्यांनी नेमकं ५ वर्ष या खात्यामार्फत राज्याच्या विकासासाठी काय केलं हे स्वतः उद्धव ठाकरे देखील सांगू शकणार नाहीत.
त्यात आता पुन्हा १८ खासदार असून देखील तेच अवजड उद्योग खातं शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना देण्यात आलं आहे. दरम्यान, काल अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांनी फटाके फोडले खरे, मात्र त्यांना याची अजिबात माहिती नसावी की या खात्याचा आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काहीच संबंध नाही आणि त्यामुळे त्याचा काहीच उपयोग मतदाराला होणार नाही, जसं मागील ३ टर्म झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आलेलं हे अवजड उद्योग खातं केवळ संबंधित मंत्र्यांनाच व्यक्तिशः फलदायी ठरल्याचा मनोहर जोशींपासूनचा इतिहास अबाधित राहील यात शंका नाही. अगदीच म्हणजे रामदास आठवले यांना देण्यात येणार समाज कल्याण खातं देखील उत्तम दर्जाचं आहे असं म्हणावं लागेल.
