नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करत आले आहेत. तसेच सध्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना त्यालाच अनुसरून सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, तसेच अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. ‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

दरम्यान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. यावर त्यांचा थेट रोख हा परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीच्या विषयावरून होता. दरम्यान, झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भारतीय जनता पक्षाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते.

मध्यंतरी देशात सीबीआय आणि सरकार दरम्यान मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं होतं. त्यावेळी देखील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला सूचक इशारा दिला होता. CBIचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यामधील वाद टोकाला गेल्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले होते आणि CBI कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. परंतु, मोदी सरकारच्या या कारवाईवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी संताप व्यक्त करताना CBI नंतर पुढचा नंबर ईडी’चा असेल, असं भाकीत सुद्धा स्वामींनी वर्तविल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सीबीआयनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई सुरु झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामींनी मत व्यक्त केलं होतं.

अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे राम मंदिर देखील भाजपला वाचवू शकणार नाही: खा. सुब्रमण्यम स्वामी