मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आता कोकणात राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणारे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव यांनी यावेळी विलास तरे यांना शिवबंधन बांधले.
तत्पूर्वी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत, ‘मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर केली होती. त्यावेळीच कोकणातील राष्ट्रवादीमधील धुसपूस चव्हाट्यावर आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा दिला होता, तरी अनंत गीते पराभूत झाले होते आणि त्यामुळे भास्कर जाधव यांची ताकद घटल्याचा प्रत्यय आला होता.
राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये एकेकाळी जुने शिवसैनिक असलेले नेते भास्कर जाधव यांचं सुद्धा नाव नाराजांच्या यादीत जोडलं गेलं आहे. त्यात पक्षातील तटकरेंच्या कुटुंबियांना मिळणार झुकत माप सुद्धा त्यांना खुपसत असून त्यांनी अनेकदा त्याबद्द्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची खिल्ली देखील एकदा भास्कर जाधव यांनी उडवली होती आणि त्यानंतर प्रसार माध्यमांनी देखील त्यावर मोठ्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र आदित्य ठाकरे यांची टिंगल करणारे तेच भास्कर जाधव आता सेनेत प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे.
