रत्नागिरी : कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर नारायण राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग ५ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी – नारायण राणे