रत्नागिरी : चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.

तिवरे धरण दुुर्घटनाग्रस्तांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. सत्ताधाऱ्यांनी खेकड्यांना जवाबदार धरत कर्तव्य निभावले नाही आणि भरपाई हवी असेल तर वाहून गेलेल्या वस्तूंचे पुरावे द्या असे प्रशासकीय आदेश देखील सोडले. मात्र यावेळी राष्ट्रवादीने स्तुत्य असं पाऊल उचललं. तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादीने मदतीचं वाटप केलं.

प्रत्येक पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत केली. शरद पवारांच्या उपस्थितीतच धनादेशांचं वाटप करण्यात आलं. तिवरे धरणतील पीडित कुटुंबांची शरद पवारांनी भेट घेतली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. स्थानिकांशी त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

एनसीपी’कडून तिवरे दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत; शरद पवारांची उपस्थिती