मुंबई: भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात जाताच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसेच त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काढलेल्या मोर्चाची तसेच गाडीभर पुराव्यांवरून देखील मोक्याच्या क्षणी लक्ष केल्याने वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

२०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागताच आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी जमिनीच्या प्रकरणावरून हळूच मंत्रिमंडळातून डच्चू दिला आणि त्यानंतर ते कधीच मंत्रिमंडळात परतणार नाहीत याची देखील दक्षता घेतली होते. विशेष म्हणजे फडणवीसांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हस्तक्षेप करून खडसेंच्या नेतृत्वाला सुरुंग लावण्याची योजना आखल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले होते.

एकनाथ खडसे हे मागील ५ वर्षांचा हिशोब आता पूर्ण करणार हे त्यांनी काल केलेल्या टीकेवरून स्पष्ट झालेले असतानाच खडसे आता पक्षात राहूनच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांवर वार करत राहणार की टोकाची भूमिका घेत पक्षालाच सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे स्पष्ट होताच पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमची काहीही चूक नसताना या निवडणुकीत डावलले गेले. सर्वाना एकत्र घेऊन लढले असते तर पक्षाच्या आणखी पाच-पंचवीस जागा वाढल्या असत्या अशी खंत व्यक्त करीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. सिंचन घोटाळ्याचे ‘ते’ गाडीभर पुरावेही आम्ही केव्हाच रद्दीत विकले असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता? सविस्तर वृत्त