मुंबई : महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये ६.४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये ७.८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर विदर्भातील नागपूरच्या धरणांमध्ये ६.२ टक्के आणि अमरावतीच्या धरणांमध्ये ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी टँकरने पाणीसाठा केला जात आहे. या पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
