मुंबई : राज्यातील तब्बल २०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा सुद्धा कमी पाऊस झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती ओढवली आहे. सप्टेबर महिन्या अखेर राज्यात सरासरीच्या ७७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २६,७३६ दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय पाणी साठय़ाच्या ६५.४८ टक्के इतका आहे.
विशेषम्हणजे मराठवाडय़ातील पाणीसाठा जेमतेम २७.७९ टक्के इतकाच शिल्लक असून नाशिक विभागातील पाणीसाठा ६४.९५ टक्के इतका आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने दडी मारल्याने तेथील शेती मोठ्या प्रमाणावर संकटात सापडली आहे. दरम्यान, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली आहे.
मराठवाड्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये टँकरच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होईल अशी शक्यता खुद्द बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. ऊस, केळी आणि मोसंबीच्या पिकांना इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा वापर जास्त होतो आणि त्यात पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणावर खालवली आहे. तसेच पाण्याच्या खालवणाऱ्या पातळीवर नासाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. केळी, मोसंबी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ड्रॉप इरिगेशन पद्धतीचा वापर करावा अशी विनंती लोणीकर यांनी केली.
संपूर्ण मराठवाड्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये टँकरने मोठयाप्रमाणावर पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. उन्हाळा आणखी ६ महिने लांब आहे तरी सुद्धा लोक आताच पाण्यासाठी वणवण करत आहेत. पाण्याअभावी अनेक शेत वाया गेली आहेत. अशी सर्व परिस्थिती ध्यानात घेता मराठवाडय़ातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्य़ांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
