मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या २ नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या जुने कट्टर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांना सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी देण्यात आली तर एनसीपीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विखेंनंतर शपथ घेतली. भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्र्वादीयुक्त होत आहे का अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात पार पडला. यात भारतीय जनता पक्षाच्या दहा तर शिवसेनेच्या २ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवले गटाच्या अविनाथ महातेकर यांच्यासह एकून तेरा जणांचा आज शपथविधी झाला. परंतु, यात आयात नेते विखे आणि क्षीरसागर यांना शपथ घेण्याची सर्वप्रथम संधी देण्यात आली. शिवसेनेकडून जुन्या शिवसैनिक आमदारांपेक्षा आयत्यावेळी पक्षात आलेल्या नेत्यांना मंत्रीपदी संधी देण्याची परंपरा अजून सुरुच आहे.

संबंधित दोन्ही आयात नेते ज्येष्ठ व अनुभवाने बडे असले तरी आयात नेत्यांना मंत्रिपद देण्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्गंत मोठी धुसफूस सुरू होती. आम्ही वर्षानवर्षे पक्षाचे काम करत आहोत, मग आयात नेत्यांना लागलीच मंत्रिपदाची संधी कशी काय देता असा सवाल काही ज्येष्ठ आमदारांनी खासगीत उपस्थित केला होता. दोन्ही पक्षात अशी धुसफूस असतानाही पक्षासाठी जे योग्य तेच केले जाईल असा देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना युती सरकारमध्ये आजच्या शपथविधी समारंभात सर्वप्रथम शपथ देण्यात आल्याचे सांगितले जाते.

काँग्रेसमुक्तीच्या नावाखाली भाजप-सेनाच काँग्रेस-राष्ट्रवादीयुक्त होत आहे?