मुंबई: राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.

शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे, आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चाही होत असतात. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यावर मौन सोडले आहे.

सहकारमध्ये काम करताना काय अडचणी असतात त्या १० कोटी लोकांपैकी १ कोटी लोकांनाच माहिती आहे. मात्र, माध्यमांमधून उरलेल्या ८-९ कोटी लोकांना वाटते भ्रष्टाचारच केला. आता यांना कुठे जाऊन सांगणार की १२ हजार कोटींच्या ठेवी असणारी बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल, असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच माझ्यासह भाजपाचे अन्य नेतेही संचालक होते. नुकत्याच बंदी आलेल्या पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा, असेही अजित पवारांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, अजित पवारांनी काही रास्त प्रश्न उपस्थित केले आणि न पटणारी आकडेवारी देखील प्रसार माध्यमांच्या समोर उपस्थित केली. तसेच शिखर बँकेच्या प्रकरणी केवळ पवार कुटुंबियांना लक्ष करण्यात आलं असून भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षातील संचालक देखील संस्थापक मंडळावर असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेपासून का लपवलं आणि आरबीआयने निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेत देखील भाजपचे संचालक आहेत असा प्रश्न उपस्थित करून भाजपाची हवाच काढून टाकली आहे.

शिखर बँकेत ठेवी १२ हजार कोटीच्या; मग घोटाळा २५ हजार कोटींचा कसा होईल: अजित पवार