मुंबई : मागील ५ वर्षांत ज्या आमदारांनी सातत्याने ग्राम पंचायतींपासून महापालिकांपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षासाठी असमाधानकारक कामगिरी, लोकसभा निवडणुकीतील आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी महत्वाच्या निकषांवर भारतीय जनता पक्षाच्या तब्बल ३० ते ३२ विद्यमान आमदारांना लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील अनेक विद्यमान आमदारांचे धाबे दणाणले आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासह देशभरात जोरदार यश मिळाले, मात्र या घवघवीत यशामागे दडलेल्या अपयशाचा बारकाईने अभ्यास करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एवढेच नव्हे तर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयाने देखील सुरू केले आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या किमान २ महिने आधीपासून २ नामवंत एजन्सी आणि संघ परिवाराशी संबंधित एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जवळपास २ दिवसांआड सखोल सर्वेक्षणे करण्यात आली. संभाव्य उमेदवारांचे रेटिंग ठरविण्यात आले. सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती ही तिकिट वाटपात महत्त्वाची ठरली होती. भारतीय जनता पक्षाने तेव्हा विद्यमान सहा खासदारांचे तिकिट कापले होते.

लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत ज्या आमदारांच्या मतदारसंघात अगदीच कमी आघाडी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मिळाली वा युती पिछाडीवर राहिली असे आमदारही पक्षाच्या रडारवर असल्याचे बोलले जाते. त्यात काही दिग्गजांचाही समावेश असून चांद्यापासून बांद्यापर्यंत हा निकष लावला जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक ज्येष्ठ पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्याकडूनही ‘फीडबॅक’ घेतला जात आहे. तो महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे काही इच्छुकांनी संघाच्या स्थानिक मान्यवरांनी आपल्याबद्दल वर चांगले मत द्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

विधानसभा २०१९: भाजप तब्बल ३०-३२ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करणार?